Thursday 19 May 2011

प्राचीन बहुजनांचा धर्म कोणता? | Religion of Ancient Indians

आजचे बहुतेक बहुजन आपला धर्म हिंदू आहे असे समजतात. पण खरे पहाता हिंदू नावाचा धर्मच अस्तित्वात नाही. शैव, जैन, बौद्ध, वैदिक यांना आपण धर्म म्हणू शकतो, कारण या धर्मांची व्याख्या करता येते, पण या तथाकथित हिंदू धर्माची धर्म या अर्थाने आजपर्यंत कोणीच व्याख्या करू शकले नाही. ज्या ग्रंथांना हिंदूचे धर्मग्रंथ मानले जाते, त्यापैकी एकाही ग्रंथात हिंदू या धर्माचा उल्लेखही नाही. मग ते वेद, उपनिषिदे, रामायण, महाभारत, वेगवेगळी पुराणे, किंवा अगदी अलिकडची ज्ञानेश्वरी असो.
          अशोकाच्या शिलालेखात समण (श्रमण) आणि बंभन (ब्राम्हण) या त्या काळातील दोन मुख्य धर्मांचे  उल्लेख आहेत. यातील समण म्हणजे जैन व बौद्ध हे होत, तर बंभन हे वैदिक ब्राम्हण होत. बहुजन हे वैदिक ब्राम्हण या धर्माचे अनुयायी असण्याचा प्रश्नच येत नाही. मग त्याकाळी त्यांचा धर्म जैन किंवा बौद्ध, अथवा त्या प्रकारचा अवैदिक (आजीवक वगैरे) असणार.
         आजही वैदिक ब्राम्हण बहुजनांना वैदिक समजत नाहीत. वैदिक ब्राम्हण जरी बहुजनांच्या घरी पूजा-पाठ व इतर धार्मिक विधी करायला जात असले, तरी हे सगळे विधी वैदिक पद्धतीने अजिबात होत नाहीत. बहुजनांसाठी ब्राम्हणांनी वेगळे पौराणिक विधी सुरु केले, पण आपल्या वैदिक पद्धतीचा वापर त्यांच्यासाठी कधीच केला नाही. हे पौराणिक विधी शुद्रांसाठीच असतात आणि वैदिक ब्राम्हण हे बहुजनांना शूद्रच मानतात. ही गोष्टही बहुजन हे प्राचीन काळी जैन अथवा बौद्ध होते हे सुचवते. कारण वेदविरोधी धर्माच्या अनुयायांना वैदिकांनी शूद्र ठरवून त्यांना कायमचे गुलाम केले हे भारताच्या धार्मिक इतिहासाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक संशोधकांनी दाखवून दिले आहे.
          एकाद्या बहुजनाच्या घरी पूजा सांगत असताना पूजा करणार्‍या गृहस्थास ब्राम्हण त्याचे गोत्र विचारतो. त्या गृहस्थास त्याचे गोत्र माहित नसतेच. मग तो ब्राम्हण त्या गृहस्थास कश्यप हे गोत्र चिकटवून देतो. त्याप्रमाणे मंत्रात कश्यप गोत्राचा उल्लेख करतो.
         असे का? तर महावीर आणि गौतम बुद्ध या दोघांचेही गोत्र कश्यप होते! म्हणजे ब्राम्हणांना बहुजनांचे मूळ धर्म जैन-बौद्ध आहेत हे चांगलेच माहित आहे हे दिसते. पण बहुजनांना हे कधी कळणार?

आभार 
महावीर सांगलीकर  

1 comment:

Unknown said...

मुसलमानी आक्रमनापर्यंत हिन्दू धर्म आस्तित्वात नव्हता. त्यानंतरच्या साहित्यात जिकडे तिकडे "हिन्दू" हां शब्द सापडतो. याची कारण असे की या परकीय मुसलमानी आक्रमनाला तोंड देण्यासाठी धर्म-आचार्यानी सर्व जातीना एक करण्यासाठी हिन्दू धर्माची प्रतीष्ठापना केली जेणेकरून सर्व देशवासिय धर्माखातर एक होतील.आणी श्रुन्गेरी धर्मपीठाने सुद्धा यासाठी अनुमती दीलेली होती. या उदात्त भावनेतुन हिन्दू धर्माची निर्मीती केली गेली. तसेच हिन्दू हा धर्म सिन्धु नादीपसून आलेला आहे.त्यामुले सिन्धु नदीपलिकडे जे राहत ते हिन्दू होत.