Sunday 22 May 2011

एक स्वप्न पुन्हा नालंदा नांदण्याचे....!

विचार
सुरेश भटेवरा 

साऱ्या जगाला अभिमान वाटावे असे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आजच्या बिहारच्या भूमीत नालंदात होते. जगभरातून आलेले साडेआठ हजार विद्यार्थी  आणि दीड हजार विद्वान अध्यापक असणारे हे विद्यापीठ धर्मांध मोहम्मद बख्तियार खिलजी या आक्रमकाने पेटवले. इथला अपार ग्रंथ संग्रह तेव्हा सतत सहा महिने जळत होता. इथल्या गुरुजनांचा या आक्रमणात बळी तरी गेला किंवा ते परागंदा तरी झाले. 'नालंदा' या भारताला अभिमान वाटणाऱ्या इतिहासाची उजळणी करण्यासाठी त्याच जागी आता नालंदा विद्यापीठ नव्याने उभे राहते आहे. त्यासाठी पुढाकार घेताहेत नीतिशकुमार आणि अमर्त्य सेन. नालंदाला भेट देऊन टिपलेली ही निरीक्षणे.

...

दुपारचे दोन. सूर्य डोक्यावर तळपत होता. तापमान ४२ डिग्री असावे. वाटेत नालंदाचा फलक वाचला. मनात कुतूहल निर्माण झाले. नालंदा विद्यापीठाविषयी आजवर बरेच ऐकले होते. एकदा नालंदात जावे आणि विद्यापीठाचे अवशेष पहावेत, अशी उत्कंठा अनेक वर्ष मनात होती. लोकसभेची निवडणूक कव्हर करण्यासाठी बिहारमधे हिंडत होतो. योग जुळला. ज्या भूमीने अनेक शतकांपूर्वी साऱ्या जगाला ज्ञानसाधनेची शीतल छाया दिली, त्या पवित्र जागेचे दर्शन घ्यावे, असे वाटले. वाट वाकडी करून नालंदात शिरलो. विद्यापीठाचा इतिहास समजावून घेण्यासाठी गाइड शंभुनाथ मिश्रांना सोबत घेतले. नालंदाच्या खंडहरात मिश्रांची रनिंग कॉमेंट्री ऐकताना, मनाचा प्रवास भूतकाळाच्या दिशेने सुरू झाला. पंधरा शतकांपूवीर्चे दृश्य थेट डोळ्यासमोर उभे राहिले.


जगाच्या ज्ञान परंपरेत बिहारच्या नालंदा विद्यापीठाचे स्थान अतुलनीय आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे हे जगातले पहिले विद्यापीठ. सलग आठ शतके साऱ्या विश्वात नालंदा ही ज्ञानदानाची तपोभूमी होती. केवळ भारतच नव्हे तर चीन, कोरिया, तिबेटसह जगातले हजारो विद्याथीर् ज्ञानार्जनासाठी इथे यायचे. प्रवेशासाठी त्यांना कडक प्रवेशपरीक्षा द्यावी लागे. दहापैकी दोनतीन विद्यार्थ्यांची निवड व्हायची. साहित्य, तर्कशास्त्र, चिकित्साशास्त्र, अंकगणित, दंडनीती, ज्योतिषशास्त्र, योगविद्या, व्याकरण, चित्रकला, शिल्पकला, मंत्रविद्या, वेदविद्या तसेच बौद्ध आणि जैन संप्रदायांची शिकवण इथे दिली जायची. सत्याच्या शोधाची पहिली अट असते स्वातंत्र्य. हा नालंदाचा मानदंड. रोज इथे १०० व्याख्याने होत. एकाच वेळी ८५०० विद्यार्थी
, विविध कलांमध्ये पारंगत व्हायचे. त्यांना शिकवण्यासाठी विद्यापीठात तब्बल दीड हजार अध्यापक होते. इथले अभ्यासक्रम प्रगत, उदार आणि बहुव्यापी होते. विविध कलासंस्कार शिकवणाऱ्या नालंदात सांप्रदायिकता नव्हती. रत्नसागर, रत्नोदय आणि रत्नरंजक अशा तीन देखण्या इमारतींमध्ये ग्रंथालय होते. या परिसराला धर्मगंज म्हणत. जगातल्या अनेक विषयांची अलौकिक ज्ञानसंपदा इथे होती. नालंदा निवासी विद्यापीठ असल्याने विद्यार्थी आणि अध्यापकांसाठी हजारो स्वतंत्र खोल्या होत्या. या वसतिगृहांच्या भिंती रूंद असल्याने हिवाळ्यात खोल्या उबदार तर उन्हाळ्यात थंड राहात. निवासाबरोबर विद्यार्थ्यांना भोजन, कपडालत्ता, औषधोपचार सारे विनामूल्य मिळायचे. कनोजचे राजे हर्षवर्धन आणि पाल राजांचा उदार आश्रय विद्यापीठाला दीर्घकाळ मिळाला. दान मिळालेल्या शंभर खेड्यांच्या उत्पन्नातून अन् राजाश्रयातून विद्यापीठाचा खर्च चालायचा. इथले विद्यार्थी होतकरू होते आणि शिक्षक बुद्धिमान, अभ्यासू आणि चारित्र्यसंपन्न होते. कौशल्यपूर्ण प्रशासन आणि राजाश्रया मुळे नालंदा विद्यापीठाची भरभराट होत गेली. आर्यदेव, शीलभद, कर्णमती, स्थिरमती, गुणमती, बुद्धकीतीर्, शांतरक्षित, कमलशील अशी विद्वानांची मालिकाच निर्माण झाली. न्यायशास्त्र ही नालंदा विद्यापीठाने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी. जगभर अध्ययन आणि अध्यापनाची श्रेष्ठ परंपरा निर्माण करण्यात, नालंदाचा अर्थातच मोठा वाटा आहे. बाराव्या शतकापर्यंत ज्ञानदानाचा अखंड यज्ञ नालंदा विद्यापीठात सुरू होता.


नालंदाजवळ पावापुरीत भगवान महावीरांना केवलज्ञान प्राप्त झाले. जैन धर्माच्या या चोविसाव्या तीर्थंकराचे महानिर्वाणही पावापुरीतच झाले. महावीरांच्या निर्वाणानंतर ७५ वर्षांनी भगवान बुद्धाला नालंदा जवळच्या बोधगयेतच चैतन्याचा साक्षात्कार झाला. त्या शतकात भगवान महावीर आणि गौतम बुद्धाने नालंदा विद्यापीठाला अनेकदा भेट दिल्याचा इतिहास, पाली भाषेतल्या नोंदीत सापडला आहे. नालंदा विद्यापीठाच्या संस्कृतीवर जैन आणि बौद्ध संप्रदायांच्या शिकवणीचा मोठा प्रभाव आहे, असे इथल्या खंडहरात वावरताना जागोजागी जाणवते. वस्तु संग्रहालयातही त्याचे अनेक मौल्यवान पुरावे आहेत. बाराव्या शतकात बौद्ध तत्वज्ञानाविरूद्ध पेटून उठलेल्या मोहम्मद बख्तियार खिलजी नामक आक्रमक युद्धखोराने, नालंदावर हिंसक हल्ला चढवला. विद्यापीठाला मिळणारा राजाश्रय ही तोपर्यंत संपुष्टात आला होता. बख्तियार खिलजीने विद्यापीठाचा विध्वंस केला. इथल्या ग्रंथालयाला आग लावली. या आगीत विद्यार्थी आणि अध्यापकांच्या सामुदायिक प्रयत्नातून निर्माण झालेली अलौकिक ज्ञानसंपदा, इथले ग्रंथ, सलग सहा महिने जळत होते. बुद्ध संप्रदायाचे अनेक प्रसारक आणि गुरू या हल्ल्यात ठार झाले अथवा परागंदा झाले.

ज्ञानाच्या शोधात हिमालय पार करून, पाहियान (इ.स. ४११)आणि ह्युएन त्संग (इ.स. ६११ ते ६४४) नालंदात आले. नालंदाच्या शिक्षण पद्धतीवर या चिनी तत्त्वज्ञांनी विपुल लेखन केले. कालांतराने ह्युएन त्संगच्या जीवनावर एक कादंबरी प्रसिद्ध झाली. ती तुफान गाजली, जगभर खपली अन् वाचली गेली. 'जनीर् टू द वेस्ट' या इंग्रजी ग्रंथाच्या अनेक आवृत्या निघाल्या. इतिहासकार म्हणतात, जागतिक ज्ञानपरंपरेत ब्रिटनच्या ऑक्सफर्ड, केंब्रिज अथवा अमेरिकेतल्या हार्वर्ड, स्टॅनफर्ड विद्यापीठांचे जसे स्थान आहे, त्याच दर्जाचे वैभव सलग आठ शतके नालंदा विद्यापीठाचे होते. ही परंपरा आणि वारसा भारताने टिकवला असता तर कदाचित देशाचा इतिहास बदलला असता.

डोंगराच्या पोटात दडलेल्या नालंदाचा ब्रिटीश व्हाईसराय कनिंगहॅम यांना १८६१ साली शोध लागला. या परिसराचे सलग दहा वर्ष १८७१ पर्यंत उत्खनन झाले. त्यात मोठी सभागृहे, बुद्धविहार, बौद्ध तत्त्वज्ञानाच्या मुदा, वसतिगृहे इत्यादींच्या स्वरूपात जणू खजिनाच सापडला. चीन, जपान, कोरिया, थायलंड, व्हिएतनामसह आशिया खंडाच्या अनेक देशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाला. भारतात डॉ. आंबेडकरांनी त्याचे पुनरूज्जीवन केले मात्र तोवर तो जवळपास लोपलेला होता. नालंदाचा ऐतिहासिक वारसा किती महान आहे, याची आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या बहुतांश नवबौद्धांना जाणीव नसावी, हे इथे लक्षात आले. 

बिहारमध्ये नेहेमीच या राज्याचे दोन चेहरे समोर येतात. राजकीयदृष्ट्या बिहार परिपक्व आणि जागरूक आहे, मात्र अलिकडे सामाजिक न्यायाचा झेंडा मिरवणाऱ्या नेत्यांनी झोटिंगशाही आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा उघड पुरस्कार केला. दांडगटांना राजकीय प्रतिष्ठा मिळवून दिली, इतकेच नव्हे तर त्यांच्या हाती सत्ताही सोपवली. या गैरव्यवहारामुळे राज्य बेशिस्त बनले. इतरांचे कायदेशीर हक्क हिरावण्याची वृत्ती वाढली आणि बिहारमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा विनाश ओढवला. मूळ बिहारची ओळख मात्र अशी नाही. इथल्या भूमीत प्रचंड ज्ञानलालसा आहे. स्वभावात धाडस आहे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात प्रचंड कष्ट करायला बिहारी लोक घाबरत नाहीत. अनेकांच्या हाती कला आणि प्रखर बुद्धी आहे. आयएएस, आयपीएससारख्या स्पर्धा परीक्षेत बिहारी विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी  सर्वाधिक असते. बेशिस्त वाटणाऱ्या भूमीत ज्ञानलालसेचा हा संस्कार नेमका कुठून आला? नालंदाच्या अवशेषांमधून तर हा प्रेरणास्त्रोत निरंतर वाहात नसावा?

माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी नालंदा विद्यापीठाच्या धतीर्वर 'इंडो एशियन इस्टिट्युट ऑफ लर्निंग चे स्वप्न पाहिले. नितीशकुमारांनी त्याला अनुसरून नालंदा विद्यापीठाचे सर्वार्थाने पुनरूज्जीवन करण्याचा निर्णय तीन वर्षा पूर्वी  घेतला. जपान आणि सिंगापूरनेही यात सहभागी होण्याची इज्छा व्यक्त केलीय. विद्यापीठासाठी नोबेल पुरस्कार विजेते अर्मत्य सेन यांच्या नेतृत्वाखाली समिती कार्यरत आहे. नव्या विद्यापीठात विज्ञानाच्या विविध शाखा, इंजिनीअरिंग, वैद्यक, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, समाजशास्त्रे, भाषा, साहित्य आणि व्यवस्थापनाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभ्यासक्रम सुरू करण्याचा समितीचा मानस आहे. बौद्ध तत्त्वज्ञानासाठी स्वतंत्र विभागाखेरीज तत्त्वज्ञान, इतिहास आणि विविध धर्मांच्या तौलनिक अभ्यासाची अद्ययावत केंदे विद्यापीठात असतील. नालंदा विद्यापीठाच्या प्राचीन अवशेषांजवळच ५०० कोटी खर्चून ४५० एकरांवर हे विद्यापीठ उभे राहील. जवळच एक खास टाऊनशिपही होईल. संस्कारांच्या आदानप्रदानाचे नालंदा पुन्हा आंतरराष्ट्रीय केंद बनावे, यासाठी बिहार सरकार आणि अर्मत्य सेन यांची समिती मनापासून मेहनत करते आहे. अर्थात विद्यापीठाचे स्वरूप आंतरराष्ट्रीय असल्याने संसदेला त्यासाठी खास कायदा मंजूर करावा लागेल. अर्मत्य सेन यांनी मध्यंतरी या प्रकल्पासाठी पंतप्रधान मनमोहन सिंगांची भेट घेतली तेव्हा त्यांनी या प्रकल्पाला तात्काळ संमती दिली. केंदात लवकरच नवे सरकार येईल. कायदेशीर सोपस्कार लवकर आटपले तर नालंदाचे पुनरूज्जीवन लवकर होईल, असे अर्मत्य सेन म्हणतात. अंधारलेल्या बिहारचे भवितव्य नालंदाच्या निमित्ताने उजळले तर साऱ्या देशालाही ते हवेच आहे!


आभार
प्रशांत म. गायकवाड


No comments: